मुंबई: आगामी राज्य सभा निवडणूकीच्या (Rajya Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी अवघे पाच दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये संभाव्य उमेदवारांबाबत जोरदार खलबते सुरू आहेत.

मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सुरुवातीला चार ते पाच नावांवर अंतिम निर्णय झाल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात सुमारे 25 इच्छुकांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

या संभाव्य यादीत विनोद तावडे, प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, दिलीप कांबळे, अमर साबळे, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, डॉ. संगीता फुसाटे यांच्यासह पक्षनिष्ठ नेते माधव भंडारी यांचे नाव चर्चेत आहे. प्रत्येक राज्यसभा निवडणुकीत त्यांचे नाव पुढे येत असते. यंदा तरी त्यांना संधी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. ते गेली अनेक वर्षे भाजपसोबत असल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे उर्वरित तीन जागांसाठी 25 जणांपैकी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता वाढली आहे.
राज्यसभा निवडणुकीचे अंकगणित
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण 7 जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील विद्यमान सदस्यसंख्या 286 असून (दोन जागा रिक्त), एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी सुमारे 36 आमदारांचा कोटा आवश्यक आहे.
भाजप: 136 आमदार
तीन जागांसाठी आवश्यक मते – 108
अतिरिक्त मते – 28
शिवसेना: 56 आमदार
एक जागेसाठी आवश्यक – 36
अतिरिक्त – 20
राष्ट्रवादी काँग्रेस: 40 आमदार
एक जागेसाठी आवश्यक – 36
अतिरिक्त – 4
महायुतीकडे एकूण 52 अतिरिक्त मते आहेत. सहावी जागा मिळवण्यासाठी 36 मते खर्ची घातल्यानंतरही 16 मते शिल्लक राहतात. मात्र सातवा उमेदवार विजयी करण्यासाठी आणखी 20 मतांची गरज भासणार आहे.
विरोधी बाकांवर, उद्धव ठाकरे गटाकडे 20, शरद पवार गटाकडे 10, तर काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. महाविकास आघाडीने एकत्रित उमेदवार दिल्यास काठावरचे बहुमत साधता येऊ शकते. काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकत्र येत उमेदवार उभा केल्यासही 36 मतांचा आकडा गाठणे शक्य आहे.
एकूणच, आकड्यांचे गणित आणि पक्षांतर्गत रणनीती यामुळे यंदाची राज्यसभा निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.







