मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला. पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल आणि कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यातील आव्हानांची पूर्ण जाणीव होती. आतापर्यंत पक्षात घडलेल्या विविध घडामोडींकडे समजूतदारपणे पाहिले गेले, मात्र यापुढे पक्षाच्या हिताला बाधा पोहोचेल अशा बाबींकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.

त्यांनी सांगितले की, पक्षाच्या वाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेतले जातील. काही निर्णय कठोर असू शकतात, परंतु पक्षहितासाठी ते आवश्यक असल्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकारी अशा निर्णयांना साथ देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षाची प्रतिमा आणि विश्वासार्हता जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी पक्षाची बदनामी होईल अशी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन केले. कठोर भूमिका घेण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख केला. प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा, मेहनत आणि समर्पण पक्ष नेतृत्वाच्या लक्षात असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य वेळी पात्र कार्यकर्त्यांना न्याय आणि संधी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
लवकरच विविध महामंडळांवरील नियुक्त्या करण्यात येणार असून त्या करताना पक्षनिष्ठा, कामगिरी आणि समर्पण यांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षासाठी किती वर्षे काम केले यापेक्षा पक्षाच्या वाढीसाठी किती योगदान दिले, याचा विचार महत्त्वाचा असेल, असेही त्या म्हणाल्या.
बाहेरून पक्षात आलेल्या नेत्यांचा सन्मान राखला जाईल, मात्र त्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन देत सुनेत्रा पवार यांनी संघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.







