मुंबई : दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या खासगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे उड्डाण तात्पुरते रोखण्यात आले होते. त्यामुळे त्यांना काही काळ मुंबई विमानतळावर थांबावे लागले. (Breaking News)

माहितीनुसार, सुनेत्रा पवार या 9 जून रोजी दिल्ली येथे आयोजित बैठकीसाठी मुंबईहून खासगी विमानाने जाणार होत्या. नियोजित वेळेनुसार त्या सायंकाळी विमानतळावर पोहोचल्या. मात्र उड्डाणापूर्वी विमानात तांत्रिक अडचण आढळून आल्याने विमानसेवा कंपनीने तत्काळ तपासणी सुरू केली.

सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. आवश्यक तांत्रिक तपासणीनंतर विमान पुन्हा उड्डाणासाठी तयार करण्यात आले. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा उशिराने त्यांचा दिल्लीकडे प्रवास सुरू झाला.
या विमानातून पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल हे देखील प्रवास करणार होते. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे या सर्व नेत्यांच्या दिल्ली प्रवासाला विलंब झाला.
काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने विमान कंपनीवर अनेक संशय व्यक्त करण्यात आले होते त्यातच आता पुन्हा हि घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
विमानवाहतुकीत प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तांत्रिक अडचण आढळल्यानंतर उड्डाण रोखून आवश्यक तपासणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून नेत्यांच्या हवाई प्रवासातील सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.







