पुणे: पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची एसटी बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

दरड कोसळल्यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून रस्त्याची स्थिती तपासली. मार्ग सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तातडीने सर्व बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पुणे एसटी स्थानकातून सुटणाऱ्या सुमारे ५० बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बससेवा बंद झाल्याने पुणे स्थानकात अनेक एसटी बस थांबून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सकाळी पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या चार एसटी बस उर्से टोल नाका परिसरात अडकल्या होत्या. मात्र, पुढील मार्ग धोकादायक असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या बसेस पुढे न पाठवता सुरक्षितपणे पुन्हा पुण्याकडे परत आणण्यात आल्या. या सर्व बसमधील प्रवासी तसेच चालक आणि वाहक सुरक्षित असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

सध्या संबंधित यंत्रणांकडून दरड हटविण्याचे आणि रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, पावसाची परिस्थिती आणि रस्त्याची सुरक्षितता लक्षात घेऊनच बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
पुणे-मुंबई हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असल्याने या निर्णयाचा मोठ्या संख्येने प्रवाशांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय या मार्गावर प्रवास टाळावा. तसेच प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी एसटी प्रशासनाची अधिकृत माहिती तपासूनच पुढील निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







