पुणे: हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला ‘गुढीपाडवा’ हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढी उभारण्याची परंपरा महाराष्ट्रात शतकानुशतके जपली जाते. यंदा 19 मार्च 2026 रोजी घराघरात गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. केवळ धार्मिक नव्हे, तर शास्त्रीय दृष्टिकोनातूनही या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गुढी कशी उभारावी? (शास्त्रोक्त पद्धत):
सूर्योदयापूर्वी तयारी: गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करावे. घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण आणि सुंदर रांगोळी काढावी.
साहित्याची मांडणी: गुढी उभारण्यासाठी एक उंच बांबूची काठी घ्यावी. ती स्वच्छ धुवून त्याला वरच्या बाजूला तांबडे किंवा रेशमी वस्त्र गुंडाळावे. त्यावर कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, गाठी (साखरेची माळ) आणि फुलांचा हार अर्पण करावा.
कलश स्थापना: या सर्वांच्या वर तांब्याचा कलश पालथा घालावा. ही तयार केलेली गुढी घराच्या दर्शनी भागात किंवा बाल्कनीमध्ये उभारावी.
पूजेचा विधी: गुढी उभारल्यानंतर तिला गंध, अक्षता आणि फुले वाहून तिची पूजा करावी. कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, गाठी सर्व अर्पण करावे. त्यानंतर गोडधोडाचा, विशेषतः पुरणपोळी किंवा श्रीखंड-पुरीचा नैवेद्य दाखवून गुढीची आरती करावी.
ही गुढी आपल्या घरातील नकारात्मकता दूर करून सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते, अशी श्रद्धा आहे. यंदा गुढी उभारण्यासाठी सकाळी 06:54 ते 10:45 पर्यंतचा वेळ अत्यंत शुभ मानला जात आहे. सूर्यास्ताच्या वेळी गुढीला हळद-कुंकू वाहून आणि गुळाचा नैवेद्य दाखवून ती सन्मानाने खाली उतरवावी.







