पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण आणि तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या गेल्या 1.5 वर्षांतील कामगिरीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.त्यामुळे मंत्र्याच टेन्शन वाढलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत ही बैठक बोलावली आहे.
अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामे खोळंबल्याची आणि संबंधित मंत्र्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची थेट तक्रार पक्षनेतृत्वाकडे केली होती. त्यामुळे या बैठकीत सर्व गोष्टींचा आढावा घेतलाजाणार आहे.या बैठकीदरम्यान केवळ कागदोपत्री निर्णय न पाहता, प्रत्यक्षात किती कामांची अंमलबजावणी झाली, याची झाडाझडती घेतली जाणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मंत्र्यांचे काम असमाधानकारक किंवा संथ आढळेल, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तसेच, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्राप्रमाणेच राज्यातही लवकरच मंत्रिमंडळ पुनर्रचना होण्याची दाट शक्यता असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निष्प्रभ ठरलेल्या मंत्र्यांवर कारवाई करून प्रशासनाला गती देणे, हा या बैठकीमागील मुख्य उद्देश असल्याच समोर आलं आहे.






