मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. काही दिवसांपासून शांत झालेल्या या चर्चांना दिल्लीत झालेल्या काही महत्त्वाच्या राजकीय भेटींमुळे पुन्हा हवा मिळाली आहे. शरद पवार, प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांच्या भेटीमुळे राजकीय समीकरणांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व दिले जात आहे. याआधी शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर झालेल्या या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भविष्यातील हालचालींबाबत चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी काही अटी आणि राजकीय चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. प्रफुल पटेल यांनी या भेटीबाबत माहिती दिल्याने विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
दरम्यान, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. आगामी राजकीय निर्णय, मतदारसंघ पुनर्रचना आणि राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या भेटींकडे पाहिले जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विलिनीकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू आहे.






