West Bengal Election : भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा ‘विश्वासपत्र’ जाहीर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यात 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यांत मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
जाहीरनाम्यात महिलांसाठी दरमहा 3000 भत्ता, बेरोजगार तरुणांसाठी 3000 आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या 6 महिन्यांत समान नागरी संहिता लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 45 दिवसांच्या आत सातवी वेतनश्रेणी लागू करण्याचेही सांगण्यात आले आहे.

महिलांसाठी नोकऱ्यांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात महिला पोलीस ठाणे आणि महिला कक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. गर्भवती महिलांना 21000 आर्थिक मदत आणि 6 पोषण संच देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. राज्य परिवहन बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
शेती क्षेत्रासाठी धान खरेदी 3100 प्रति क्विंटल दराने करण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी स्वतंत्र योजना राबवण्याचे सांगितले आहे. उद्योग क्षेत्रासाठी 4 नवीन औद्योगिक वसाहती उभारण्याचा प्रस्ताव आहे. हल्दिया बंदराच्या विकासावरही भर देण्यात आला आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा उल्लेख आहे.
राज्यातील अतिक्रमणे 200 दिवसांच्या आत हटवण्याचा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेवर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, पहिल्या 100 दिवसांत विकास आराखडा सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील तेंतुलिया येथे प्रचारसभा घेतली. त्यांनी भाजपवर टीका करत राज्याबाहेरील लोकांना निवडणुकीसाठी आणल्याचा आरोप केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख पक्षांकडून प्रचार मोहीम आणि जाहीरनाम्यांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.







