weather update : महाराष्ट्रात मार्चअखेर हवामानाने पुन्हा एकदा अनिश्चिततेचा कळस गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले वादळी वातावरण, अधूनमधून पडणारा पाऊस आणि वाढती उष्णता यामुळे राज्यभर अस्मानी संकट अधिक गडद होत आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही भागांत गारपिटीचा इशारा दिला आहे, ज्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी सतर्क राहणं अत्यावश्यक ठरलं आहे.

आज राज्यात कोरड्या ते अंशतः ढगाळ हवामानाची स्थिती राहील. काही ठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हलक्या पावसाचीही शक्यता आहे. कमाल तापमान 31 ते 39 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 ते 28 अंश दरम्यान राहणार आहे. सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या 4 जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम असून, मुंबईसह किनारपट्टी भागात तापमान 31 ते 32 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पुढील 2 दिवसांत दक्षिण कोकणात वादळी पावसाची शक्यता वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रात आज तुलनेने शांतता दिसत असली, तरी ही “वादळापूर्वीची शांतता” असल्याचे संकेत आहेत. सोमवारपासून वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास पर्यंत वाढून बहुतांश भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात सध्या तापमान 34 ते 37 अंशांदरम्यान आहे. आज काही जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील, पण 30 मार्चपासून संपूर्ण भागात अवकाळी पाऊस सक्रिय होईल. विदर्भातही तापमान 36 ते 39 अंशांपर्यंत वाढत असून, पुढील 2 दिवसांत वादळी पावसाचा धोका आहे.
या परिस्थितीमागे बदलते दाबमान, उष्णतेची लाट आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कारणीभूत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीला बसत असून, काढणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण, तर नागरिकांनी विजेपासून आणि वादळी वाऱ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.







