दौंड : उन्हाळा सुरू झाला की,प्रत्येक वर्षी दौंड तालुक्यातील काही भागात भयावह दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते.बोरिबेल, गाडेवाडी , शिंगडवाडी,मलठण, खडकी, रावणगाव, काळेवाडी, अशा अनेक गावातील ओढे,नाले, विहीरी कोरड्याकाठ पडतात.त्यामुळे शेतकऱ्यांवर अनेक आशेवर घेतलेली पिके पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आली आहे.या भागातील शेतकऱ्यांना आठ माहीच शेती करण्याची वेळ प्रत्येक वर्षी येत आहे. कॅनॉल असून देखील वेळेच्या वेळी पाणी येत नाही हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.त्यातच उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे.त्यामुळे शेतकरी पाण्याअभावी आपली शेती पडीक ठेऊ लागला आहे.
या भागातील शेतकऱ्यांना उन्हाळी पाण्याचे आवर्तन घेण्याची गरज प्रत्येक वर्षी भासत आहे.कॅनॉलला येणारे पाणी वेळच्यावेळी यावे असा सवाल शेतकरी वर्गातून समोर येत आहे. सद्य परिस्थितीत देखील नशिबाच्या भरोस्यावर या भागातील शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज काकडी अशी उन्हाळी पिके घेतली आहेत.परंतु पाण्याअभावी हाता -तोंडाशी आलेला घास असाच शेतात सोडून देण्याची वेळ आली आहे.दरवर्षी प्रमाणे शेतकरी यावर मात करण्यासाठी कमी कालावधीची पिके पिकवतो परंतु उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी कमी पडल्याने शेतकऱ्याच्या नशिबी नेहमी निराशाच येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेततळ्यासाठी तसेच अस्तरीकरण यासाठी अनुदान दिले जाते यामध्ये थोडे बदल व्हावेत कारण शासनाकडून मिळणारे अनुदान अन् प्रत्यक्षात होणारा खर्च यामध्ये खूप मोठी तफावत आहे. अशा दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळी हा एक उत्तम पर्याय आहे. शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत फक्त शेततळी आधार ठरू शकतात.यासाठी शासनाने अनुदानात वाढ करावी, अशी मागणी दत्तात्रय जेडगे – मा.सरपंच बोरिबेल/ गाडेवाडी यांनी केली आहे.