न्हावरे : आंबळे(ता.शिरूर) परिसरातील आंब्याचा मळा येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव जनावरांवर हल्ले करून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा चार वर्षांचा नर बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.गुरुवारी (दि.६)पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई यशस्वी ठरली.त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकत समाधान व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून आंबळे परिसरात बिबट्याने शेळ्या,गाई, वासरे,कालवडी तसेच पाळीव कुत्र्यांवर वारंवार हल्ले केले होते. याशिवाय शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांनाही वेळोवेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वन विभागाने चासकमान डाव्या कालव्यालगत आंब्याचा मळा परिसरात बिबट्याच्या नियमित वावराच्या ठिकाणी अचूक नियोजन करून पिंजरा उभारला होता.सुरुवातीला बिबट्या वन विभागाला वारंवार हुलकावणी देत होता.मात्र अखेर गुरुवारी पहाटे तो पिंजऱ्यात अडकला आणि वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भानुदास शिंदे,वनरक्षक गणेश झिरपे,संदीप गव्हाणे,मनोज चौधरी आणि दिनेश गोऱ्हाड यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.पकडलेल्या बिबट्याला पुढील तपासणी व पुनर्वसनासाठी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली भीती अखेर दूर झाली असून,वन विभागाच्या तत्पर कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.मात्र,परिसरात वन्यजीवांचा वावर लक्षात घेता भविष्यातही नियमित गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरूच ठेवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.






