पुणे : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अचानक हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे.पक्षातील गळती रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ममता बॅनर्जी दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील हलिशहर येथे ही घटना घडली आहे.

हलिशहर भागातील तृणमूल काँग्रेसच्या एका मृत कार्यकर्त्याच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ममता बॅनर्जी तिथे गेल्या होत्या. मात्र, त्या ठिकाणी पोहोचताच नागरिकांच्या तीव्र रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. स्थानिक लोकांनी त्यांच्या वाहनाला चारही बाजूंनी घेरले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पाहता पाहता जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी बॅनर्जी यांच्या गाडीच्या दिशेने चिखल फेकला. इतकेच नव्हे तर पाण्याच्या बाटल्या आणि बूट-चप्पलसुद्धा भिरकावण्यात आले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि संतप्त जमावाला बाजूला करत बॅनर्जी यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या राजकीय प्रवासात मी असा प्रकार कधीही अनुभवला नव्हता,” असे सांगत त्यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले.

दरम्यान पोलिसांच्या ढिसाळ सुरक्षेमुळेच हा हल्ला शक्य झाला आणि पोलीस विरोधी पक्षातील लोकांना पाठिंबा देत आहेत, असा दावा त्यांनी केला. निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून अनेक नेते पक्ष सोडून गेले आहेत. अशा काळात पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था देण्यासाठी ममता बॅनर्जी जनसंपर्क अभियान राबवत आहेत.
मात्र, हलिशहर येथील या घटनेमुळे बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून आता यावर सरकार काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







