पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेचा पहिला टप्पा नुकताच पार पडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील 6,22,207 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. मात्र.लाभार्थी मयत झाल्यास वारसांना लाभ मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता.आता शासनाने यावर महत्त्वपूर्ण तोडगा काढला आहे.

मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांनी आपले नाव महसूल दप्तरी नोंदवून त्याची माहिती संबंधित सेवा संस्था किंवा राष्ट्रीयकृत बँकेत सादर करावी. या प्रक्रियेनंतर वारसांना कर्जमुक्तीचा लाभ दिला जाईल. यासंदर्भात काही अडचण किंवा तक्रार असल्यास तालुक्यातील सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारकडून ही कर्जमुक्ती योजना तीन टप्प्यांऐवजी आता दोन टप्प्यांत राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात थकीत पीक कर्जाची रक्कम थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे.

कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. तांत्रिक त्रुटी आणि कागदपत्रांची पूर्तता वेळेत झाल्यास सर्व पात्र शेतकऱ्यांना याचा त्वरित फायदा मिळणार आहे.







