Maharashtra Farmer loan waiver: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी कर्जमाफी योजनेत कर्ज रकमेची कोणतीही मर्यादा ठेवली जाणार नाही, अशी महत्त्वाची माहिती मिळत आहे. या नव्या निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांचा थेट सातबारा कोरा होणार असून, सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे. (Shetkari Karja Mafi)

जुनी मर्यादा संपुष्टात
पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये दीड ते दोन लाखांपर्यंतची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. मात्र, आता ही मर्यादा हटवल्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या 24 लाख 73 हजार थकबाकीदार शेतकरी आहेत. तर बँकांची एकूण थकबाकी जवळपास 35, 477 कोटी रुपये एवढी आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.


कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आली आहे. प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधी अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल.”
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, असे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आणि 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याच्या आश्वासनामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.







