पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असताना महामार्गाच्या सुरक्षेचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र यवत परिसरात पाहायला मिळत आहे. महामार्गाच्या कडेला वाहनांना रोखण्यासाठी लावण्यात आलेली लोखंडी सुरक्षा पत्रे (MBCB) अनेक ठिकाणी तुटलेली, गायब झालेली अथवा नागरिकांनी आपल्या सोयीनुसार काढून टाकलेली आहेत. त्यामुळे भरधाव वाहने थेट शेतात, दुकानांमध्ये किंवा वस्तीमध्ये घुसण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने डिसेंबर 2024 पासून नियुक्त कंत्राटदार पुणे सोलापूर एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत सुरक्षा पत्रे बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तब्बल 20 महिने उलटूनही महामार्गावरील अनेक धोकादायक ठिकाणी अद्याप सुरक्षा पत्रे बसविण्यात आलेली नाहीत.

यवत परिसरातील प्रवीण मसाला कंपनीसमोरील सुरक्षा पत्रे अपघातात तुटून जवळपास महिनाभर झाला, तरीही ती अद्याप दुरुस्त अथवा नव्याने बसविण्यात आलेली नाहीत. महामार्गावर वाहनांचा वेग मोठा असल्याने रात्रीच्या वेळी अंधार, वळणे आणि रस्त्याच्या कडेला असलेली असुरक्षितता यामुळे चालकांचे नियंत्रण सुटल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

यवत गावाच्या सुरुवातीला महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सेवा रस्ते सुरू होतात. मात्र, सायंकाळनंतर या ठिकाणी ट्रक, टेम्पो आणि मालवाहतूक वाहने मोठ्या प्रमाणावर महामार्गालगत उभी केली जातात. सोलापूरकडून यवतकडे येणाऱ्या वाहनचालकांना मुख्य मार्गावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे समोरील वाहतूक स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताला खुले आमंत्रण मिळत आहे. या ठिकाणी सुरक्षा पत्रे बसवावीत किंवा महामार्गावर मालवाहतूक वाहनांना पार्किंग करण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाच दिवसांपासून जाळी गायब
यवत येथे नागरिकांकडून वारंवार रस्ता ओलांडला जात असल्याने काही दिवसांपूर्वी महामार्गाच्या मध्यभागी सुरक्षेसाठी लोखंडी जाळी बसविण्यात आली होती. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून ही जाळीच गायब झाली आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा थेट महामार्ग ओलांडताना दिसत आहेत. विशेषतः शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची या ठिकाणी मोठी वर्दळ असल्याने जाळी हटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन जाळी पुन्हा बसवावी, अशी मागणी होत आहे.
‘सुरक्षे’च्या नावाखाली नागरिकांची कोंडी; पर्यायी मार्गाची मागणी
महामार्ग ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी जाळी बसविल्यानंतर नागरिकांना अनेकदा जवळपास एक किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. श्री काळभैरवनाथ मंदिराशेजारील मोरी पादचारी वाहतुकीसाठी खुली करून नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
आपल्या सोयीनुसार फोडले दुभाजक; प्रशासनाचे दुर्लक्ष?
महामार्गाच्या काही भागात प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने दुभाजक तयार केले आहेत. मात्र, काही ठिकाणी नागरिक अथवा वाहनचालकांनी आपल्या सोयीनुसार दुभाजक फोडून अनधिकृत मार्ग तयार केल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडून अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्ग प्रशासनाने अशा सर्व अनधिकृत दुभाजकांची तातडीने पाहणी करून ते बंद करावेत. तसेच आवश्यक ठिकाणी अधिकृत यू-टर्न किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का?
पुणे-सोलापूर महामार्ग हा पुणे, दौंड, सोलापूरसह अनेक शहरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, सुरक्षा पत्रे तुटलेली, जाळी गायब, महामार्गावर पार्किंग आणि मनमानी दुभाजक अशी परिस्थिती कायम राहिल्यास एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, महामार्ग प्रशासनाने कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष पाहणी करून तुटलेली सुरक्षा पत्रे तातडीने बसवावीत, गायब झालेली जाळी पुन्हा लावावी, महामार्गालगतचे बेकायदा पार्किंग हटवावे आणि अनधिकृत दुभाजक बंद करावेत, अशी जोरदार मागणी यवत परिसरातील नागरिकांनी केली आहे.







