अक्षय टेमगिरे
शिरूर, (पुणे) : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी चिमणीच्या संवर्धनाची गरज अधोरेखित होत असताना, शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. शिरूर तालुका पर्यावरण मंडळाच्या चिमणी संवर्धन अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार केली आहेत.

ही घरटी शाळेच्या परिसरातील झाडांवर तसेच इमारतीच्या विविध भागांमध्ये बसविण्यात आली असून, कडाक्याच्या उन्हात सर्व ऋतूंमध्ये चिमण्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध होणार आहे. शाळेचा परिसर हिरवाईने नटलेला असला तरी वारा आणि पावसामुळे नैसर्गिक घरटी वारंवार नष्ट होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कायमस्वरूपी उपाय म्हणून कृत्रिम घरटी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्याध्यापक राहुल चातुर सर, विद्यार्थिनी स्वरा चिखले आणि कार्याध्यक्ष प्रवीणकुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक साधनांचा वापर करून ही घरटी तयार करण्यात आली आहे. या उपक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांची घटती संख्या आणि संरक्षणाची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत असून समाजातही सकारात्मक संदेश पोहोचत आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांच्या संरक्षणासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ शाळापुरता मर्यादित न राहता समाजासाठीही अनुकरणीय ठरत आहे.







