पुणे : महाराष्ट्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांचा ताफा सकाळी ८ च्या सुमारास वर्षा बंगल्याकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.

ही भेट जरी अचानक वाटत असली तरी मिळालेल्या माहितीनुसार ती दोन दिवसांपूर्वीच पूर्वनियोजित होती. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे केंद्र आणि राज्य सरकारसह भाजप नेत्यांवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करत आहेत. नुकत्याच झालेल्या मेळाव्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधला होता. याशिवाय मुंबई-गोवा महामार्गाची स्वतः पाहणी केल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले होते.

तसेच, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात जवळीक वाढल्यापासून राज ठाकरेंची सरकारविरोधी भूमिका अधिक आक्रमक झाली आहे. अशा तणावपूर्ण राजकीय वातावरणात ही भेट झाल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.मात्र, या भेटीमागे राजकीय कारणांसोबतच इतर काही प्रमुख मुद्दे असल्याची चर्चा आहे.

दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क जिमखान्याशी संबंधित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे . या वेळी राज ठाकरे यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक हेदेखील उपस्थित होते. याशिवाय, नुकत्याच केलेल्या पाहणीच्या आधारे राज ठाकरे मुंबई-गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामावरही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सततच्या टीकेनंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कोणतीही टोकाची प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता या प्रदीर्घ चर्चेनंतर राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







