पुणे: पुरंदर विमानतळ (Purandar Airport) प्रकल्पामुळे पुणे आणि परिसरातील (Devendra Fdanavis) औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून हा प्रकल्प केवळ प्रवासी विमानतळ न राहता कार्गो विमानतळही ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे (Pune News) पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात किमान 2 टक्के वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सात गावांतील ग्रामस्थ व प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. (Breaking News)

संवाद कार्यक्रम
या संवाद कार्यक्रमाला माजी मंत्री विजय शिवतारे, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव संजय सेठी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह प्रकल्पबाधित गावांतील नागरिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुरंदर विमानतळ हा महाराष्ट्र आणि पुण्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. भूसंपादनासाठी रेडीरेकनरनुसार दर न ठरवता वाटाघाटी करून दर निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या बाजारभावापेक्षा अधिक लाभ मिळेल.
टीडीआरसंदर्भात लाभ
पुरंदर येथील एरोसिटी प्रकल्पात टीडीआरसंदर्भातील सर्व लाभ देण्यात येतील. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल. भूसंपादनाचा दर अंतिम झाल्यानंतर युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात येईल. प्रकल्पासंदर्भात यापूर्वी झालेल्या आंदोलनांतील दाखल गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मोबदला आणि पर्यायी जमीन देणारा राज्यातील पहिला प्रकल्प
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, प्रकल्पबाधित शेतकरी आणि नागरिकांचे योग्य पुनर्वसन हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कुटुंबाची रचना लक्षात घेऊन पुनर्वसन करण्यात येणार असून सज्ञान मुलांसाठी अतिरिक्त जागा देण्याचा विचार आहे. अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठीही विशेष उपाययोजना करण्यात येतील. पुरंदर विमानतळासाठी संपादित जमिनीचा मोबदला आणि पर्यायी जमीन देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा
पुरंदर विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पबाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येईल. बागायती झाडांच्या दरांबाबतही चर्चा करून तोडगा काढला जाईल. राज्यातील सर्व प्रकल्पबाधितांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचाही विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुरंदर विमानतळ प्रकल्पासंदर्भातील आतापर्यंतच्या कार्यवाहीची माहिती दिली. ग्रामस्थ प्रतिनिधींनी आपल्या मागण्या आणि निवेदने मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. संवादातून अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून प्रकल्पबाधितांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.







