Pune : पुणे आणि कोकणाला जोडणारा निसर्गरम्य वरंधा घाट लवकरच 2 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग 965 डीडीवरील रखडलेलं काम पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रशासनाच्या अंतिम निर्णयाकडे आता हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

या निर्णयामागे मुख्य कारण म्हणजे घाटातील अवघड भौगोलिक परिस्थिती. हिर्डोशी ते वरंधा घाट हा टप्पा अत्यंत अरुंद असून, एका बाजूला देवघर धरणाचं पाणी तर दुसऱ्या बाजूला उंच डोंगर आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करताना कामगारांसाठी तसेच वाहनांसाठी धोका निर्माण होतो. सध्या काही भागात ‘डीएलसी’चे काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित भागात काम करताना वाहतूक सुरू ठेवणं धोकादायक ठरू शकतं.
महत्त्वाचं म्हणजे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे 1-2 महिने आधीच काम पूर्ण करून रस्ता सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वन विभागाच्या परवानग्याही प्रक्रियेत असून कामाला वेग देण्याची तयारी दिसते.
हा घाट बंद झाला तर त्याचा थेट परिणाम प्रवाशांवर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. पुणे-कोकण प्रवासासाठी हा सर्वात जवळचा मार्ग मानला जातो. पर्याय म्हणून ताम्हिणी घाट किंवा पोलादपूर मार्ग वापरावा लागेल, ज्यामुळे प्रवासात 1-2 तासांची वाढ होऊ शकते.







