पुणे : चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या परिसरातील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.

पावसाळ्यात डांबरी रस्ते वारंवार खराब होत असल्याने, आता खड्डे बुजवण्यासाठी एम-60 आरएमसी विथ हार्डनर आणि जिओ पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे मिश्रण केवळ 30 ते 45 मिनिटांत सेट होत असल्याने वाहतूक तातडीने पूर्ववत करणे शक्य होत आहे. अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांवर प्री-कास्ट काँक्रीट पॅनेलचा वापर करून दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे.

या भागातील रस्ते, पाणी, वीज आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी 3-स्तरीय (ह्रस्व, मध्यम आणि दीर्घकालीन) कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. PMRDA, MIDC, PWD आणि NHAI या संस्थांमध्ये समन्वय राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक दर शुक्रवारी होणार आहे.

वाहतूक सुधारणा आणि इतर मोठे निर्णय
रस्त्यांची कामे: तळेगाव ते शिक्रापूर या 54 किमी मार्गाची दुरुस्ती, नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्ता आणि अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण वेगाने केले जाईल.
मेट्रो प्रकल्प: नाशिक फाटा-चाकण-राजगुरूनगर आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गांवर मेट्रो सुरू करण्यासाठी डीपीआर (DPR) तयार करण्याचे निर्देश महामेट्रोला देण्यात आले आहेत.
कामगार टाउनशिप: कामगारांचा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी औद्योगिक परिसरात क्लस्टरच्या माध्यमातून वसाहती उभारण्याचा विचार सुरू आहे.
भूसंपादन: रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, योग्य मोबदला देऊनच भूसंपादन केले जाईल.
उपमुख्यमंत्र्यांनी उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत पायाभूत सुविधा त्वरित पुरवण्याचे आश्वासन दिले. यामुळे चाकणमधून एकही उद्योग बाहेर जाणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.







