पुणे : राजधानी दिल्लीतील जतंरमंतर येथील यशस्वी आंदोलनानंतर अभिजित दिपके चांगलेच चर्चेत आले.त्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी अभिजित दिपके यांना थेट पक्षाध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे अभिजित दिपके प्रस्ताव स्वीकारणार का याकडे सर्वांचें लक्ष लागून राहिले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्षाच्या विविध गटांच्या एकत्रीकरणासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. समाजात एक प्रभावी राजकीय व सामाजिक ताकद निर्माण करायची असेल, तर सर्व रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ऐक्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आणि गरज पडल्यास 4 पावले मागे जाण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचे मोठे विधान आठवले यांनी केले.

सध्या रिपब्लिकन चळवळीत आठवले गट, खोब्रागडे गट, गवई गट आणि आंबेडकर गट असे अनेक विचारप्रवाह वेगळे काम करत आहेत. हे सर्व गट एकाच छताखाली आले, तर वंचितांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून देणे अधिक सोपे होईल. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या एकत्र आलेल्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी इच्छा व्यक्त करत, भविष्यात सर्व रिपब्लिकन नेते एकाच मंचावर दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आठवले यांनी सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके यांनाही रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याचे खुले आमंत्रण दिले आहे. दीपके हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे तरुण कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’सारख्या वेगळ्या मार्गाने जाण्याऐवजी रिपब्लिकन चळवळ मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
दीपके यांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांना युथ विंगचे ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ पद देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली असून लवकरच त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सत्तेत असलो तरी समाजातील अन्यायाविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील, असा पुनरुच्चार आठवले यांनी केला. जिथे अन्याय होईल तिथे पक्ष खंबीरपणे उभा राहील आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी सरकार तत्पर आहे. त्यामुळे दीपके यांच्यासारख्या धडपडणाऱ्या तरुणांनी रिपब्लिकन पक्षात येऊन मुख्य प्रवाहात योगदान द्यावे, असे मत त्यांनी मांडले.







