मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Politics) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Local Body Elections) महायुतीने एक महत्त्वाचा निर्णय (Mahayuti) घेतला आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये वाढत असलेले अंतर्गत वाद लक्षात घेता, एकमेकांच्या पक्षात प्रवेश देण्यास बंदी घालण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे. यापुढे महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाचा नेता, पदाधिकारी किंवा कार्यकर्ता दुसऱ्या घटक पक्षात प्रवेश करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Breaking News)

महायुतीचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची येत्या 2 ते 3 दिवसांत बैठक होणार असून, या बैठकीत या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या निर्णयानुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना पक्षात न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विरोधी पक्षांमधील नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यास कोणताही आक्षेप नसणार आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये फोडाफोडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, एकत्र काम करताना मतभेद होऊ शकतात, मात्र मनभेद नाहीत. महायुतीमध्ये चर्चेची दारे नेहमी उघडी आहेत. पूर्वी ठरल्याप्रमाणेच महायुतीतील कोणताही नेता किंवा पदाधिकारी इतर घटक पक्षात प्रवेश करणार नाही, यावर सर्वांचे एकमत झाले आहे. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा भाजपमध्ये किंवा भाजपचा शिवसेना अथवा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात काही ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. कल्याण-डोंबिवली भागात शिवसेनेतील काही नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना पक्षात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीने फोडाफोडी रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.







