पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्रातील लाखो महिलांना लाभ मिळत आहे. पण यामध्ये निकषात न बसणाऱ्या महिलांनी सुद्धा याचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात शासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. अर्जांची पुन्हा पडताळणी करुन निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. ज्या महिला या योजनेच्या निकषांत बसत नाहीत, त्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे. अधिक उत्पन्न आणि चारचाकी वाहन असून देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले, जे निकषांविरोधात आहे. विशेष म्हणजे सरकारी कर्मचारी असलेल्या महिला देखील या योजनेच्या लाभार्थी आहेत. अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे, मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही पडताळणीची प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे.






