पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) 8 खासदारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे 15 मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, पक्षाकडून या सर्व चर्चा फेटाळून लावत ही भेट केवळ महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांकडून महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली.

तसेच मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, पीक विमा योजनेत आवश्यक बदल करावेत आणि कांद्याच्या दराचा प्रश्न त्वरित सोडवावा. तसेच उजनी धरणातून मांजरा नदीत पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, पुणे-नाशिक मेट्रो, कल्याण-मुरबाड रेल्वे मार्ग यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण करावीत. यासोबतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने त्वरित पाठवावा, अशी मागणी मांडली गेली.
गंभीर आजारांवरील उपचारांसाठी ‘पीएम केअर्स फंड’मधून खासदारांना मिळणाऱ्या निधीत वाढ करावी, कॅन्सरच्या उपचारासाठी मोठी तरतूद करावी आणि पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
संसदेचे कामकाज स्थगित असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या व मतदारसंघाच्या समस्या सोडवण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.
तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या. “आम्ही विरोधी पक्षातच आहोत आणि तिथेच राहू. मतदारसंघातील विकासकामांसाठी पंतप्रधानांची भेट घेणे म्हणजे सत्ताधाऱ्यांसोबत जाणे असा होत नाही,” असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.







