पुणे : दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलकांचे नेतृत्व करणारे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनाच्या यशानंतर राजकारणात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.दिपके यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीविषयी स्पष्टता दिली आहे.आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसून नवा राजकीय पक्षही स्थापन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ”

पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या आंदोलनाला राजकीय पक्षांऐवजी थेट जनतेचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही तरुण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी एक ‘प्रतिसाद समूह’ म्हणजेच दबाव गट म्हणून काम करू,” असे ते म्हणाले. हे काम नेहमी लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गानेच केले जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला.

या आंदोलनाच्या प्रचंड दबावामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागला. CJP च्या या यशाबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यामार्फत दिपके यांच्या आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचे अभिनंदन केले.
दुसरीकडे, भाजप नेत्यांकडून धमक्या आल्याच्या दिपकेंच्या आरोपावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पलटवार केला आहे. “कोणी धमकी दिली असेल तर थेट नाव जाहीर करावे,” असे आव्हान देत विखे-पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी संसदेत कायदा झालेला असताना अशा प्रकारे संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. विरोधक या आंदोलनाच्या आडून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.






