पुणे: इंडिगो कंपनीने गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये (Indigo Flight Cancellation) आवश्यक असलेल्या (Murlidhar Mohol) तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे सध्या निर्माण झालेली परिस्थिती उद्भवली (Pune News) असल्याचे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. या प्रकरणाची हवाई वाहतूक मंत्रालयाने तात्काळ दखल घेतली असून, इंडिगोला पुन्हा संपूर्ण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी काही वेळ लागणार असल्याने संबंधित नियमांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच या नियमांची मुदत फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, इंडिगोच्या सीईओंना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे, असे मोहोळ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर पायलट असोसिएशनने पायलटांच्या ड्युटीचे तास 10 वरून 8 करण्याची मागणी केली होती. या मागणीवर दिल्ली उच्च न्यायालयानेही निर्देश दिले होते. त्यानंतर डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना पायलटांची ड्युटी वेळ 8 तास करण्याचे आदेश दिले. यासाठी दोन टप्प्यांमध्ये अंमलबजावणी करण्याचे नियोजन विमान कंपन्यांना देण्यात आले होते. मात्र, इंडिगोने शेवटच्या दिवसापर्यंत या संदर्भात आवश्यक ती तयारी केली नाही.
परिणामी अचानक पायलटांचे ड्युटी तास कमी झाले आणि त्यातच मनुष्यबळाची कमतरता असल्याने इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाली. देशातील सुमारे 65 टक्के विमान वाहतूक सेवा इंडिगो पुरवत असल्यामुळे या गोंधळाचा परिणाम मोठ्या प्रमाणात प्रवाशांवर झाला.
दरम्यान, अन्य विमान कंपन्यांकडून वाढवण्यात येणाऱ्या तिकीट दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंतरानुसार कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांची विमाने रद्द झाली आहेत, त्यांना कोणतेही कॅन्सलेशन चार्ज न लावता संपूर्ण तिकिटाची रक्कम पुढील 48 तासांत परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करून जादा तिकीट दर आकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.






