Pune News हडपसर, ता. 3 : किल्ल्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील गढ्या या आपल्या वैभवशाली इतिहासाच्या जिवंत साक्षीदार असून, त्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, मात्र त्यासोबत समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असे ठाम प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी केले. Pune News

हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात लेखक प्रवीण हरपळे लिखित ‘गढी’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच महाराष्ट्रातील दुर्लक्षित गढ्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. Pune News
संभाजीराजे म्हणाले की, “आपल्या इतिहासाच्या खुणा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. गढ्या हे केवळ दगडी बांधकाम नसून आपल्या संस्कृतीचा जिवंत ठेवा आहे. हे वैभव जपण्यासाठी शासन, सामाजिक संस्था आणि गिर्यारोहण संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” यावेळी त्यांनी व्यासपीठावरील शासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. Pune News
आमदार चेतन तुपे यांनी गढी या पुस्तकाचे कौतुक करत गढ्यांच्या संवर्धनाचा मुद्दा विधानसभेत मांडणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी किल्ले, गढ्या व वाडे यांच्या संरचनेतील साम्य-भेद स्पष्ट करत ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज अधोरेखित केली. तसेच राजस्थान व गुजरातमधील संरक्षित किल्ल्यांची तुलना करत महाराष्ट्रातील स्थितीबाबत खंत व्यक्त केली. Pune News
इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, आमदार राहुल कुल यांनीही आपले विचार मांडले. लेखक प्रवीण हरपळे व प्रकाशक दामोदर मगदूम नाईक यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास उलगडला. या कार्यक्रमास साहित्यिक अमर जाधवराव, अरुण बोर्हाडे, नगरसेवक मारुतीआबा तुपे, निवृत्तीअण्णा बांदल, महेश हरपळे, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक नानासाहेब झांबरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे, एव्हरेस्ट वीर श्रीहरी तापकीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीहरी तापकीर यांनी केले.
“आमच्या परिसरातील युवा लेखक प्रविण हरपळे यांनी अतिशय वेगळा विषय घेऊन त्याबाबतची सविस्तर माहिती नागरिकांपुढे मांडली आहे. गढ्यांचे महत्त्व किती आहे, हे त्यांच्या पुस्तकातून तसेच त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून सहज लक्षात येते.”
— मारूतीआबा तुपे, नगरसेवक
“किल्ल्यांप्रमाणेच गढ्यांनाही ऐतिहासीक महत्त्व आहे. आजही ग्रामीण भागात अशा गढ्या पाहायला मिळतात, त्यांचे जतन करणे गरजेचे आहे. शहरालगत असलेल्या गढ्यांच्या संवर्धनाबाबत महापालिकेत मुद्दा मांडणार आहे.”
— निवृत्तीअण्णा बांदल, नगरसेवक






