पुणे : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात कायमस्वरूपी उभे असते. त्यांच्या अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासन केंद्राप्रमाणेही राज्यातील शेतकऱ्यांना “नमो किसान सन्मान योजनेतून ” वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देत होते. आता तीन हजार रुपये यात वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून दिले जाणारे 6000 रुपये आणि राज्य सरकारचे वाढीव 9000 रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमध्ये ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या १९व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथे राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.राज्य सरकारतर्फे ३,००० रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही घोषणा केली असली, तरी वाढत्या वित्तीय तुटीमुळे भविष्यातील आर्थिक नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार योजना आणली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली त्यानंतर केंद्र शासनाकडून बळीराजा जल संजीवनी योजना मंजूर करून घेण्यात आली.