Government Employees Retirement Age : देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार लवकरच मोठे बदल करण्याच्या तयारीत असून, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्याच्या ६० वर्षांवरून ६२ वर्षे करण्याच्या प्रस्तावावर गंभीर चर्चा सुरू आहे. हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून, तो लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास, लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. (Government Employees Retirement Age)

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यामागे वाढलेले सरासरी आयुर्मान आणि सुधारलेल्या वैद्यकीय सुविधा हे महत्त्वाचे कारण आहे. गेल्या काही वर्षांत नागरिकांचे आरोग्य सुधारले आहे. त्यामुळे, अनुभवी कर्मचाऱ्यांची कौशल्ये प्रशासकीय यंत्रणेत अधिक काळ वापरता यावी, यासाठी सरकार हा बदल करण्याच्या विचारात आहे. केंद्राकडून यासंबंधी कोणताही निर्णय घेतल्यास, केंद्राच्या धर्तीवर अनेक राज्यांनी बदल करण्याची शक्यता वाढते.

यामुळे महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीलाही बळ मिळणार आहे. महाराष्ट्रात सध्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. हे वय ६० वर्षांपर्यंत वाढवण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पूर्वी सकारात्मक निर्णय देण्याचे संकेत दिले होते. तरीदेखील यावर अद्याप कोणतीही स्पष्ट पाऊले उचलली गेली नसल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. मात्र, केंद्राच्या निर्णयामुळे राज्यालाही सेवा वयाचा निकष बदलावा लागू शकतो आणि याचा थेट फायदा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे.







