पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयामध्ये ही यादी अधिकृतपणे जारी केली.यादीत नाव आलेल्या आणि इतर सर्व उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा थेट लाभ मिळण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा लाभ मिळणार नाही.

1. ई-केवायसी (e-KYC): आपले सेवा केंद्र किंवा इतर सुविधा केंद्रावर जाऊन ही पडताळणी पूर्ण करावी लागेल.

2.ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी: ही नोंदणी शेतकरी ऑनलाइन स्वरूपात घरबसल्या ‘Farmer Registry’ पोर्टलवरून करू शकतात. त्यासाठी मोबाईलशी जोडलेले ओळखपत्र, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि पीक कर्जाचा तपशील आवश्यक आहे. पोर्टलवर माहिती भरल्यानंतर ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी करून अर्ज सबमिट करावा. काही अडचण आल्यास जवळच्या सेवा केंद्राची मदत घेता येईल.
या दोन्ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच शासनाकडून अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल आणि जुनी थकबाकी माफ होईल.
सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यात एकूण 533 शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यांच्यासाठी सरकारने 2 कोटी 99 लाख 37 हजार 540 रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या पहिल्या यादीत विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे:
ठाणे: 182, लातूर: 133,पुणे: 85,अमरावती: 58,सातारा: 38 सोलापूर: 21, नागपूर: 16
सहकार विभागाने निधी वितरणाबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्यादेखील लवकरच टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जातील. या याद्या नागरिकांना ऑनलाइन पोर्टलवर, तसेच स्थानिक ग्रामपंचायत आणि बँकांच्या सूचना फलकावर पाहायला मिळणार आहे.आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती प्राप्तिकर विभागाकडून मिळणे अद्याप बाकी आहे.







