पुणे : महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुण पिढीला रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून राज्यभरात 31 मार्च 2027 पर्यंत एकूण 1000 रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत या उपक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, आयुक्त डॉ. अमित सैनी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यातून निवड होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी उमेदवारांना थेट मुलाखतीआधी दोन आठवड्यांचे विशेष पूर्व-प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पूर्व प्रशिक्षणाच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांचे व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, बायोडाटा तयार करणे आणि कॉर्पोरेट शिष्टाचार यांवर प्रशिक्षण होईल. दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार प्लंबिंग, मार्केटिंग, इलेक्ट्रिसिटी आणि रिसेप्शनिस्ट यांसारख्या क्षेत्रांतील प्रात्यक्षिकांवर भर दिला जाईल.केवळ ITI नव्हे, तर इतर सर्व महाविद्यालयांतील तरुण, अपस्किलिंगची गरज असणारे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांना (NGO) या अभियानात जोडले जाईल.

तसेच तरुणांना स्वयंरोजगाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि एनजीओंच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर समुपदेशन केले जाईल.या सर्व मेळाव्यात जास्तीत जास्त गरजू तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसाराच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर समन्वयाने काम करून तरुण वर्गाला थेट नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.







