पुणे : दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एका नव्या वळणासह मोठा राजकीय रंग चढला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडून स्वतंत्र तपास सुरू केला असून, त्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणावर आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाचं प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी असे म्हटले आहे की,”मी माझ्या हयातीत दिशा सालियान यांना कधीही भेटलेलो नाही आणि माझी त्यांच्याशी कोणतीही वैयक्तिक ओळख नव्हती,” राजकीय द्वेष आणि चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशानेच गेली काही वर्षे सातत्याने या दुर्दैवी घटनेशी कसलाही ठोस पुरावा नसताना आपले नाव जोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ अफवांवर आधारलेली माध्यमांमधील चर्चा आणि राजकीय बोंबाबोंब सत्य बदलू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना तें म्हणाले, तपास यंत्रणांनी कोणत्याही राजकीय दबावाला किंवा हस्तक्षेपाला बळी न पडता निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे ही चौकशी पूर्ण करावी. खोट्या प्रचाराच्या किंवा चारित्र्यहननाच्या प्रयत्नांना न घाबरता अन्यायाविरोधातील हा लढा असाच सुरू राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

दिशा यांच्या वडिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे लैंगिक अत्याचार आणि हत्येसारखे गंभीर आरोप लावत हा तपास सुरू करण्यात आला आहे. जबाबात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करण्यात आल्याचे दावे राजकीय वर्तुळात केले जात आहेत
.दुसरीकडे, शिंदे गटासह इतर विरोधी नेत्यांनी या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सीबीआयच्या या नव्या तपासातून नक्की काय निष्पन्न होते आणि प्रकरणातील सत्य कसे समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







