पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हा विस्तार 21 ऑगस्ट रोजी होऊ शकतो. नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाची खाती बदलणार, याविषयी आता उत्सुकता ताणली गेली आहे.अशातच आता सीजेपीच्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राजकारणात प्रवेश करणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, फडणवीस यांनी स्वतः या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राच्या जनतेने आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण निष्ठापूर्वक पार पाडत असून, भविष्यातही महाराष्ट्रातच राहून जनतेची सेवा करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सीजेपीच्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागलेले माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या या मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा समावेश केला जाऊ शकतो. त्यांच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे सध्या असलेली मंत्रालये कायम राहणार की बदलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विशेष म्हणजे, पर्यटन खात्याची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्याकडे ठेवण्याची शक्यताही सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
या मंत्रिमंडळ फेरबदलामुळे केंद्र सरकारमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची चिन्हे असून लवकरच अंतिम चित्रावर शिक्कामोर्तब होणार आहे.







