पुणे : महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या परिसरात गेल्या 6 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. सुरक्षेचा उपाय म्हणून हा मार्ग प्रवाशांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर देत विरोधकांना कडक इशारा दिला आहे.

या मिसींग लिकवरून झालेल्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून अवघ्या 18 तासांच्या आत या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू केली.
“दरड वरून कोसळली आहे, मुख्य प्रकल्पाला काहीही झालेले नाही. केबल स्टे ब्रिजला कुठेही तडे गेलेले नाहीत किंवा बोगद्यात पाणी साचलेले नाही. उलट, बोगद्यामुळेच आमचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया स्वतः प्रवाशांनी दिली आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, “देवेंद्र फडणवीसला कितीही शिव्या द्या, मी ‘शिव्या प्रूफ’ आहे. आज टीका करणारे 10 वर्षांनी नसतील, पण हा भव्य मार्ग पिढ्यानपिढ्या राहणार आहे. महायुती सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही हा प्रकल्प पूर्ण करून दाखवला. सोशल मीडियावर पैशांच्या जोरावर या प्रकल्पाची विनाकारण बदनामी सुरू आहे. मला बदनाम करा, पण महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही.”असा कडक इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या परिसरात दरड कोसळल्यानंतर या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींवर बोट ठेवत, “प्रकल्प उभारताना पर्यावरणीय परिणामांचा योग्य अभ्यास केला होता का?” असा सवाल उपस्थित केला.
तसेच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी “प्रकल्पाचे श्रेय घेता, तर मग आता या अपयशाची जबाबदारीही स्वीकारा,” असे आव्हान सरकारला दिले.तसेच संजय राऊत यांच्यासह इतर विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत, “7000 कोटी रुपये पाण्यात गेले” अशी टीका केली. तसेच, हे काम करणाऱ्या कंपनीने भाजपला 900 कोटी रुपयांची देणगी दिल्याचा गंभीर आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता.







