पुणे: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आपली तक्रार निवारण व्यवस्था अधिक प्रगत आणि पारदर्शक केली आहे. आता रेल्वे प्रवासादरम्यान निकृष्ट दर्जाचे किंवा अस्वच्छ अन्न मिळाल्यास, प्रवाशांना आपली तक्रार मांडणे सहज शक्य झाले आहे. रेल्वे प्रशासन अशा तक्रारींची त्वरित दखल घेत दोषींवर कडक कारवाई करते, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय टाळता येईल.

जर प्रवासात तुम्हाला खराब जेवण मिळाले, तर सर्वप्रथम ‘रेल मदत’ ॲप किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या आणि तिकडे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. तसेच तुम्ही हेल्पलाईन नंबर 139 वर कॉल करून थेट कस्टमर केअर प्रतिनिधीशी बोलून तक्रार नोंदवू शकता.

रिफंडच्या बाबतीत, तुम्ही पेमेंट कसे केले होते, यावर प्रक्रिया अवलंबून असते. ऑनलाइन ई-केटरिंग ॲप किंवा वेबसाइटवरून जेवण बुक केले असल्यास, ‘ऑर्डर हिस्ट्री’मध्ये जाऊन तुम्ही थेट रिफंडसाठी अर्ज करू शकता. तक्रार वैध आढळल्यास रेल्वे प्रशासन थेट बँक खात्यात रक्कम परत करते. मात्र, पँट्री स्टाफला थेट रोख रक्कम दिल्यास रिफंड मिळवणे कठीण होऊ शकते. तरीही, पुराव्यांसह तक्रार केल्यास रेल्वे संबंधित कंत्राटदाराला १ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते.



