पुणे : राज्यातील ई -बस खरेदीचा गोंधळ आता पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाने विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार इव्हे ट्रान्स कंपनीशी केला असून या कंपनीने वेळेत बस पुरवल्या नसल्याकारणाने या कंपनीसोबतचा करार महामंडळाने रद्द केला असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सदर कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र एसटी महामंडळानं 5150 ई -बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार इव्हे ट्रान्स कंपनीशी केला आहे. ही कंपनी दर महिन्याला 215 बस देणार होती पण वेळेत बस पुरवण्यात आल्या नाहीत. या कंपनीवर कारवाई करण्यावरून परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष यांच्यात वाद सुरू असतानाच महाराष्ट्र एसटी कर्मचारी सरचिटणीस श्रीरंग बरंगे यांनी सरकार कंपनीवर कारवाई करण्यास घाबरत आहे का असा सवालच उपस्थित केला. तसेच परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष यांच्यात एक वाक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटलं. या प्रकरणाने एसटी खरेदीचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
विजेवरील बसच्या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते . परंतु मार्च 24 ते मार्च 25 या कालावधीत पुरवठादार कंपनीकडून एसटीला 220 बसेसचं पुरविण्यात आल्या आहेत. कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचं कंत्राट यापूर्वीच रद्द करायला हवे होते. मध्यंतरी मुख्यमंत्री कार्यालयातील प्रिन्सिपल सेक्रेटरीकडून वेळेत बसेस न पुरविणाऱ्या डिफॉल्टर कंपनीची प्रलंबित बिले देण्यासाठी एसटी प्रशासनावर दबाव आणला. व देय असलेल्या बिलाची काही रक्कम चुकती करण्यास भाग पाडले. त्यानंतर परिवहन विभागाने अपर मुख्य सचिव व एसटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी कंपनीला बस पुरविण्याबाबतीत नवीन वेळापत्रक जारी करत 1287 बस पुरविण्यात याव्यात असे पत्र देण्यात आले. त्याची मुदत संपण्यापूर्वीचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची घोषणा केली आहे.