Bike Taxi : मुंबई : गेल्या काही महिन्यांत शहरात आणि उपनगरांमध्ये प्रवासासाठी बाइक टॅक्सीचा (Bike Taxi) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी वेळेत पोहोचणे आणि स्वस्त प्रवासाचा पर्याय म्हणून अनेक जण बाइक टॅक्सी निवडत आहेत. मात्र, या सेवांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे बाइक टॅक्सी सेवांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या 24 तासांत राज्य सरकार याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. Mumbai News

राज्यात वाढत असलेल्या तक्रारी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन बाइक टॅक्सी बुकिंगवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात बुधवारी परिवहन मंत्री आणि वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवाव्यात की बंद कराव्यात, तसेच रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांना दिलेले तात्पुरते परवाने रद्द करावेत का, यावर चर्चा होणार आहे.
सध्या राज्यात अनेक खासगी कंपन्या बेकायदेशीररीत्या बाइक टॅक्सी सेवा चालवत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अपघातांची संख्या वाढली असून काही ठिकाणी प्रवाशांचा मृत्यू तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. अलीकडेच कल्याण येथे एका बाइक टॅक्सी चालकाने तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बाइक टॅक्सी सेवांना अधिकृत परवानगी नसतानाही या सेवा सुरू आहेत. विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बाइक टॅक्सी रस्त्यावर धावत असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी टॅक्सीवर स्पष्ट बंदी असतानाही नियमांकडे दुर्लक्ष करून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.
प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता सरकारकडून कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पुढील काळात बाइक टॅक्सीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे.






