Bhigwan भिगवण, ता. 24 : दरवर्षी पावसाळा आला की पाणी साचून नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागणाऱ्या भिगवण (ता. इंदापूर) शहरातील प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) ठोस उपाययोजनांचे निवेदन सादर केले. या हालचालीमुळे नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. Bhigwan

पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य माडगे आणि जिल्हा कोषाध्यक्ष सचिन बोगावत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पाटस टोलनाका येथे एनएचएआयचे मुख्य व्यवस्थापक कणीकुमार यांची भेट घेतली. यावेळी भिगवण शहर आणि परिसरातील पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेऊन विविध उपाय सुचविण्यात आले. Bhigwan
हॉटेल श्रीशांत ते मदनवाडी चौफुला या मार्गावर सर्व्हिस रोडलगत मोठ्या क्षमतेची ड्रेनेज लाईन उभारण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. भिगवणच्या पश्चिमेकडील डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शहरात येते. हे पाणी योग्य पद्धतीने वाहून नेण्यासाठी सध्याची व्यवस्था अपुरी पडत असून, नव्या ड्रेनेज प्रकल्पामुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. Bhigwan
फक्त नवीन ड्रेनेजच नव्हे, तर विद्यमान लाईनमधील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मोठ्या चेंबरद्वारे पाण्याचे विभाजन करण्याचीही गरज अधोरेखित करण्यात आली. सध्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे पाणी साचून रस्ते जलमय होतात आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. एस.टी. स्थानकासमोरील पुलावरील प्रलंबित स्ट्रीट लाईट पोल बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच हॉटेल श्रीशांत ते दत्तकला स्कूल, चिंचोली या मार्गावर नवीन स्ट्रीट लाईट्स बसविण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. या उपाययोजनांमुळे अपघातांचा धोका कमी होऊन नागरिकांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. Bhigwan
या महत्त्वाच्या बैठकीला माजी उपसरपंच प्रदीप वाकसे, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अमोल देवकाते यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने भिगवणच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. मुख्य व्यवस्थापक कणीकुमार यांनी शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या लक्षपूर्वक ऐकून घेत त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भिगवणकरांना यंदाच्या पावसाळ्यात दिलासा मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Bhigwan







