बारामती: बारामती लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर (Ajit Pawar) आता विधानसभेच्या पातळीवर (Jai Pawar) पुनरागमन केलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा रंगू लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या चर्चांमुळे पक्षांतर्गत काही नेत्यांचा हिरमोड झाल्याचे दिसत असले, तरी अखेर अजित पवार यांनी या सर्व चर्चांवर पडदा टाकत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

पुण्यात पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर अजित पवार प्रथमच बारामतीत दाखल झाले. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षातील नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “इच्छुकांशी चर्चा करून पुढील दोन दिवसांत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि त्यानंतरच अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाईल.”
गेल्या काही आठवड्यांपासून जय पवार नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर “जयपर्वाचा प्रारंभ” अशा घोषणांसह समर्थकांकडून प्रचारही केला जात होता. मात्र या चर्चांवर पूर्णविराम देताना अजित पवार म्हणाले, “पत्रकारांनी सांगितलेली चर्चा बारामतीत चालू आहे हे खरे; पण जय पवार नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी करणार नाहीत.” त्यांच्या या विधानानंतर जय पवारांच्या नावाभोवतीचा सस्पेन्स अखेर संपला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, “सोमवार ते शुक्रवार मी राज्याचा आढावा घेतला आणि आज सकाळपासून बारामतीत परिस्थितीचा आढावा घेत आहे. बारामतीकरांनी नेहमी मला साथ दिली आहे. माझ्या राजकीय जीवनात चढ-उतार आले, पण बारामती आणि माळेगाव नगरपंचायतीचा कायापालट करून दाखवण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे.”
ते पुढे म्हणाले, “उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. बुधवारी मी पुणे शहर आणि ग्रामीण भागातील तयारी पाहणार असून गुरुवारी बारामती नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेईन. त्यानंतर एक मोठा मेळावा घेऊन माझी भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे.”
अजित पवार यांनी महायुतीच्या माध्यमातून बारामतीसह परिसरात केलेल्या विकासकामांचाही उल्लेख केला. “चिन्हवाटपानंतर प्रचारासाठी केवळ सहा दिवस राहतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे. मतदारसंख्या जरी मर्यादित असली तरी आमचे लक्ष्य विकास आहे. जेजुरी, सासवड, उरुळी देवाची, दौंड, इंदापूर, खेड, आळंदी, तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि जुन्नर या नगरपरिषदांच्या निवडणुकांकडेही माझे विशेष लक्ष असेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
बारामतीतील या हालचालींमुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांची राजकीय तापमानपातळी वाढली आहे. जय पवारांची संभाव्य उमेदवारी बाद झाल्याने आता नगराध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेत नवीन समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.






