Airtel Network : यवत (पुणे) : यवत परिसरात एअरटेल मोबाईल नेटवर्क सेवेचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्याचे चित्र शनिवारी (ता. १६) पाहायला मिळाले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक एअरटेलचे नेटवर्क बंद पडले आणि तब्बल १२ तास ग्राहकांना मोबाईल सेवा मिळालीच नाही. अखेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सेवा पुन्हा सुरळीत झाली. Airtel Network
नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांना दिवसभर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. फोन कॉल, मेसेज, इंटरनेट, व्हॉट्सअॅप यांसारख्या सेवा पूर्णपणे बंद पडल्याने अनेकांचे कामकाज खोळंबले. काही नागरिकांनी मोबाईलमध्ये बिघाड झाल्याचा समज करून मोबाईल दुरुस्ती दुकानांकडे धाव घेतली. मात्र ही समस्या नेटवर्कची असल्याचे समजताच ग्राहकांनी एअरटेल कंपनीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. Airtel Network
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यवत परिसरात वीजपुरवठा खंडित झाला की एअरटेलची मोबाईल सेवा लगेच बंद पडते. गेल्या अनेक दिवसांपासून नेटवर्क कधी सुरू तर कधी बंद अशी परिस्थिती निर्माण झाली असून ग्राहक त्रस्त झाले आहेत. “मोबाईल म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा” अशी अवस्था ग्राहकांची झाली आहे. Airtel Network
एअरटेल कंपनीने मोठ्या प्रमाणावर ग्राहक आकर्षित केले असले तरी वारंवार खंडित होणाऱ्या सेवेने आता ग्राहकांचा संयम सुटू लागला आहे. अनेक ग्राहक आता इतर खासगी मोबाईल कंपन्यांकडे वळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. Airtel Network
दरम्यान, ग्राहकांच्या तक्रारींकडे कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. यवत परिसरातील मोबाईल नेटवर्क सेवा तातडीने सुरळीत करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. Airtel Network







