पुणे : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातून धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. सांडोळ-महांडोळ रस्त्यावर 35 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक स्कूल बस अचानक उलटल्याचा भीषण अपघात झाला आहे . या अपघातानंतर घटनास्थळावर काही वेळ प्रचंड भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्राथमिक अहवालानुसार, राचन्नावाडी येथील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालया’ची ही बस होती. शाळा सुटल्यानंतर किंवा भरताना ही बस साधारण 30 ते 35 विद्यार्थ्यांना घेऊन नेहमीप्रमाणे प्रवास करत होती. मात्र, सांडोळ–महांडोळ मार्गावर अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याशेजारी जाऊन पलटी झाली. बस उलटताच आतील मुलांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासकीय यंत्रणेलाही याची माहिती देण्यात आली. सर्वांनी मिळून बसमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले.
या अपघातात जवळपास 22 ते 23 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमी मुलांना तातडीने उपचारासाठी चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.हा अपघात अत्यंत भीषण होता, मात्र सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याने पालकांनी आणि प्रशासनाने मोठा सुटकेचा श्वास सोडला आहे.
दरम्यान, हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की बसमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता, याचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. स्थानिक पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अपघाताच्या मुख्य कारणाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.







