मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. वयाच्या 60व्या वर्षी त्याने मैत्रीण गौरी स्प्रॅट हिच्यासोबत विवाह केल्यानंतर सोशल मीडियावर आणि काही राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी या विवाहावर ‘लव्ह जिहाद’चे आरोप करत टीका केली असून, या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे.

या वादावर आमिर खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली. विवाहांबाबत बोलताना त्याने सांगितले की, त्यांच्या कुटुंबात विविध धर्मांतील व्यक्तींशी विवाह होणे ही नवी बाब नाही. त्याच्या बहिणी आणि मुलीने हिंदू मुलासोबत विवाह केला आहे, तर चुलतभाऊ मन्सूर याने ख्रिश्चन धर्मीय महिलेशी लग्न केले आहे. गौरी स्प्रॅट ही ख्रिश्चन धर्मीय असून, त्यांचा विवाह कायदेशीर सिव्हिल मॅरेज पद्धतीने झाला असल्याने धर्मांतराचा कोणताही संबंध या विवाहाशी नसल्याचे आमिरने स्पष्ट केले.

आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, हा त्याचा तिसरा विवाह आहे. यापूर्वी त्याचे रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबत विवाह झाले होते. त्याला जुनैद, इरा आणि आझाद अशी तीन मुले आहेत. 5 जुलै रोजी अत्यंत मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत आमिर आणि गौरी यांनी विवाह केला. गौरी व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित असून, तिचाही हा दुसरा विवाह आहे.







