नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या शुल्क वाढीमुळे व्यापार युद्ध भडकले आहे. विशेषतः अमेरिका आणि चीनमधील व्यापार व्यवहारात अधिक तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण या दोन्ही देशांमधील व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकांना फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. कारण अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान चीनमधील अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या भारतीय कंपन्यांना ५ टक्क्यांपर्यंत किमती कमी करण्याच्या ऑफर्स देऊ लागल्या आहेत. याचाच अर्थ असा आहे की, येणाऱ्या काही दिवसात स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती भारतात कमी होऊ शकतात.
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या मागणी वाढवण्यासाठी या सवलतीचा काही लाभ ग्राहकांना देऊ शकतात. भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांत वापर होणाऱ्या सर्व भागांपैकी सरासरी तीन-चतुर्थांश सुटे भाग चीनमधून आयात होतात. चीन आणि अमेरिकेतील तीव्र व्यापार युद्धामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे, दरम्यान, दोन्ही देशांमधील या संघर्षात भारतीय कंपन्यांना फायदा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अधिक शुल्क लागू झाल्याने निर्यातदार कंपन्यांवर दबाव वाढला आहे. कारण त्यांना आता अमेरिकेतून कमी ऑर्डर मिळत आहेत. अशा परिस्थितीत, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना वाटाघाटी करण्याची संधी मिळू शकते. ते आता चीनमधून स्वस्त दरात वस्तू आयात करू शकतात. यामुळे मोबाईल, फ्रिज, टीव्ही या वस्तू स्वस्त होऊ शकतात.
सर्वसामान्यपणे इलेक्ट्रॉनिक्स उद्योग हा दोन ते तीन महिन्यांच्या कच्च्या मालाच्या साठवणुकीवर चालतो. कंपन्या मे-जूनपासून नवीन ऑर्डर देतील. ‘जीटीआरआय’च्या अलीकडील एका अहवालानुसार, भारताची आर्थिक वर्ष २०२४ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स घटकांची आयात मागील वर्षाच्या तुलनेत ३६.७टक्क्यांनी वाढून ३४.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. ही आयात गेल्या पाच वर्षांत ११८.२ टक्क्यांनी वाढली, असे वृत्तात पुढे म्हटले आहे.