न्हावरे : न्हावरे गावात वास्तव्यास असलेल्या काही परप्रांतीय भाडेकरूंच्या कथित बेजबाबदार वर्तनामुळे गावातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.रात्री उशिरापर्यंत दारूच्या नशेत गावात फिरणे,मध्यरात्री गोंधळ घालणे, आपापसात भांडणे आणि सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल अशा घटना घडत असल्याचा आरोप अनेक ग्रामस्थांनी केला आहे.त्यामुळे गावातील शांतता पूर्ण आणि सुरक्षित वातावरण धोक्यात येत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, परप्रांतीय नागरिकांच्या गैरवर्तणुकीच्या प्रकारांबाबत वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधूनही अद्याप ठोस आणि प्रभावी कारवाई झालेली नाही.त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, “एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

याच पार्श्वभूमीवर गावात वास्तव्यास आलेल्या एका कुटुंबाबाबतही ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार,हे कुटुंब अत्यंत असुरक्षित परिस्थितीत उघड्यावर राहत असल्याचे दिसून येत असून, त्यांच्यासोबत दोन लहान मुलीही आहेत.अशा परिस्थितीत संबंधित कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने तातडीने स्वीकारून आवश्यक ती मदत,निवारा व संरक्षण उपलब्ध करून द्यावे.अशी मागणी होत आहे.
स्थानिक अनेक नागरिकांच्या म्हणण्यानुसार परप्रांतीय कामगारांना रोजगार देणारे कंत्राटदार,व्यावसायिक तसेच घरमालक यांनी केवळ काम करून घेण्यापुरती जबाबदारी न मानता त्यांच्या वास्तव्यासंबंधी आणि वर्तनासंदर्भातही आवश्यक खबरदारी घ्यावी.तसेच सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल किंवा कायद्याचे उल्लंघन होईल असे प्रकार घडणार नाहीत.याची दक्षता संबंधितांनी घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान,नियमांनुसार भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायतीकडे नोंदविणे आवश्यक असताना या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.ग्रामपंचायतीने गावभर विशेष भाडेकरू पडताळणी मोहीम राबवून सर्व माहिती संकलित करावी आणि नियमांचे पालन न करणाऱ्या घरमालकांना नोटिसा द्याव्यात त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी.अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.
गावातील कायदा-सुव्यवस्था ही केवळ पोलीस यंत्रणेची जबाबदारी नसून ग्रामपंचायत,स्थानिक प्रशासन,कंत्राटदार,घरमालक आणि नागरिक या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले. प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत राबवल्यास भविष्यातील संभाव्य अनुचित घटना टाळता येऊ शकतात.असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रिया देताना अनेक स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले की, परप्रांतीय नागरिकांची शोध मोहीम ही भूमिका कोणत्याही समाज, राज्य किंवा भाषेविरोधात नसून गावातील शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि प्रत्येक नागरिक,विशेषतः महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून,त्यामुळे संबंधित यंत्रणांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी.अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
“सजग नागरिक – सुरक्षित गाव, हीच आपली सामूहिक जबाबदारी. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.”
–अजित जाधव(पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
“ग्रामपंचायतीमार्फत गावातील परप्रांतीय रहिवासी व भाडेकरूंची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून ती माहिती पोलीस प्रशासनाला उपलब्ध करून दिली जाईल.”
–विठ्ठल करपे(ग्रामविकास अधिकारी,न्हावरे ग्रामपंचायत)
“ग्रामपंचायतीकडून संशयित अथवा परप्रांतीय मजूर व रहिवाशांची माहिती प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पडताळणी व सर्च ऑपरेशन राबविण्यात येईल.”
–सागर शेळके(पोलीस उपनिरीक्षक,न्हावरे आऊटपोस्ट)






