Daund News दौंड, ता. १७ : पाटस-दौंड मार्गावरील निष्काळजी प्रशासनाचा फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसला असून, गतीरोधकावर पांढऱ्या पट्ट्या नसल्यामुळे दोन कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी (ता. १७) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. पाटस ग्रामपंचायत हद्दीतील अंबिका पब्लिक स्कूलसमोर झालेल्या या अपघातात सहा जण जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Daund News
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा नेक्सोन कार दौंडहून पुण्याकडे जात होती, तर बलोनो कार पाटसकडून दौंडच्या दिशेने येत होती. रस्त्यावर असलेल्या गतीरोधकावर कोणत्याही प्रकारच्या पांढऱ्या चेतावणी पट्ट्या नसल्याने नेक्सोन चालकाला गतीरोधकाचा अंदाज आला नाही. भरधाव वेगात असलेल्या कारने अचानक गतीरोधकाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, नेक्सोन कारचे एक चाक तुटून समोरून येणाऱ्या बलोनो कारवर आदळले. Daund News
या भीषण अपघातात बलोनोमधील चार आणि नेक्सोनमधील दोन जण असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याने घटनास्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. Daund News
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “गतीरोधकावर पांढऱ्या पट्ट्या माराव्यात” अशी मागणी अनेक वेळा करूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. Daund News
दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.






