Crime News : जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील मोराड गावात चौथी मुलगी झाली म्हणून पित्यानेच आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या बाळाचा जीव घेतल्याचं तपासात उघड झालं आहे. (crime news)

ही घटना 14 नोव्हेंबरला घडली होती. सुरुवातीला कुटुंबीयांनी बाळाचा मृत्यू अपघाताने झाल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र दीड महिन्यानंतर आलेल्या वैद्यकीय अहवालामुळे सगळं सत्य समोर आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा लालचंद राठोड याच्या पत्नीने चौथ्या मुलीला जन्म दिला होता. मात्र मुलगी झाल्यामुळे तो नाराज होता. बाळाची तब्येत बिघडल्याचं सांगून तिला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
शवविच्छेदन अहवालात मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचा संशय वाढला. सखोल तपास केल्यानंतर वडिलांनीच गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पहूर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
आजही मुलगी नको, ही मानसिकता किती खोलवर रुजलेली आहे, याचं हे भयावह उदाहरण असल्याचं नागरिक म्हणत आहेत.
ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर समाजाला आरसा दाखवणारी आहे. मुलींविषयीची असंवेदनशील विचारसरणी आणि अज्ञान आजही किती घातक आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.







