विशाल शिंदे
Bhor News भोर, ता. 18 : नसरापूर बाजारपेठेत दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहक असल्याचे भासवत पाच महिलांनी आणि एका लहान मुलाने सोन्या-चांदीच्या दुकानात प्रवेश करून अत्यंत शिताफीने तब्बल ८४ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुख्य बाजारपेठेतील पंडित ज्वेलर्स येथे घडली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. Bhor News

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेत मोठी गर्दी असताना आरोपी महिलांनी चोरीचा डाव आखला. सुरुवातीला दोन महिला आणि एक लहान मुलगा दुकानात आले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची पाहणी करण्यास सुरुवात केली. काही वेळाने आणखी तीन महिला दुकानात दाखल झाल्या. त्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष वेगवेगळ्या ग्राहकांकडे वळले.

दरम्यान, नथनी पाहण्याच्या बहाण्याने महिलांनी विविध डिझाईनचे पाऊच हातात घेतले. त्याच वेळी एका महिलेने अत्यंत चलाखीने नथनीचे पाऊच आपल्या साथीदार महिलेकडे आणि नंतर त्या मुलाच्या हातात दिले. काही क्षणांतच हा सर्व प्रकार घडला. दुकानातील कर्मचाऱ्यांना कोणताही संशय न येऊ देता सर्व आरोपी कोणतीही खरेदी न करता दुकानातून निघून गेले. Bhor News
सुरुवातीला दुकान मालकांना चोरी झाल्याचे लक्षात आले नाही. मात्र काही दिवसांनी नथनीचे दोन पाऊच गायब असल्याचे पंडित ज्वेलर्सचे मालक विनय पंडित यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिलांनी आखलेल्या चोरीच्या कटाचा पर्दाफाश झाला. Bhor News
या चोरीत सुमारे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले असून, त्यांची किंमत ८४ हजार ६०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. सीसीटीव्हीत आरोपी महिलांची हालचाल स्पष्टपणे दिसत असल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. Bhor News
दरम्यान, नसरापूर परिसरात मागील काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी आणि अन्य गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार व्यापारी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे. “राजगड पोलीस स्टेशन नसरापूरमधून हलवल्यानंतर पोलिसांची गस्त कमी झाली असून, त्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
यापूर्वी मेडिकल दुकाने फोडणे, घरफोडी तसेच अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांमुळे परिसरात आधीच भीतीचे वातावरण आहे. आता भर बाजारपेठेत झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नसरापूर बाजारपेठेत पोलिसांची नियमित गस्त वाढवावी, चोरी करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी आणि राजगड पोलीस स्टेशन पुन्हा नसरापूर परिसरात सुरू करावे, अशी मागणी व्यापारी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. Bhor News







