लहू चव्हाण
पाचगणी : दानवली (ता.महाबळेश्वर) येथे विजेची तार अंगावर पडल्याने बैलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रविवारी (ता.१४) साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दैव बलवत्तर असल्याने मालक व दुसरा बैल वाचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दानवली हे गाव भिलार पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील ग्रामस्थ शेतीवर गुजराण करीत आहेत. गावातील शेतकरी एकनाथ किसन दानवले हे आपली बैलजोडी रानात चारण्यासाठी सकाळी गेले होते.
दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हवेली लावली. त्यामुळे दानवले हे आपले बैल चारून घरी गावाकडे येत होते. परंतु गावच्या हद्दीत पाठीमाची वाडी परिसरात दानवले आपले बैल घेवून येत असताना अचानक ऐका बैलाच्या अंगावर खांबावरची विज वाहक तार तुटून पडली. या तारेचा शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर दैव बलवत्तर असल्याने मालक व दुसरा बैल वाचला आहे.
दरम्यान, एकनाथ दानवले यांचा बैल मेल्यामुळे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. तर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्याचे काम चालू आहे.