पुणे : आशिया चषकातील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी एकच चढाओढ लागली आहे.क्लासिफाइड वेबसाइट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांचा सर्रासपणे काळाबाजार केला जात आहे.
दुबईत येत्या 28 ऑगस्टला होणाऱ्या आशिया चषकातील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची विक्री 15 ऑगस्टपासून सुरू झाली होती. केवळ तीनच तासांत सर्व तिकिटांची विक्री झाली. तिकिटांची मागणी इतकी होती की हजारो चाहते 5 लाखांपेक्षा जास्तीच्या ऑनलाइन वेटिंग लिस्टमध्ये होते. दरम्यान, पहिल्या सामन्याचे तिकीट न मिळालेले चाहते फायनल व सुपर-4 सामन्यासाठी आतापासूनच जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
एक तिकीट 5,500 दिरहॅमला (सुमारे 1 लाख 20 हजार रुपये) विकले जात आहे. प्रत्यक्षात या तिकिटाचे मूळ मूल्य ५४ हजार रुपये इतके आहे. याच प्रमाणे 5,400 रुपयांचे साधारण तिकीट 54 हजार रुपयांना विकले जात आहे.
शारजाचे रहिवासी साद अहमद म्हणाले, ‘मी सकाळी ८ वाजताच एकाच वेळी चार कॉम्प्युटर्सवर वेबसाइट उघडली. नशिबाने 20 मिनिटांतच तिकीट मिळाले.’ दुबईत राहणारे विशाल सिंह म्हणाले, ‘ऑनलाइन रांगेत 4 तासांनी फक्त एक प्रीमियम मिळवता आले.’
आशिया कपचे तिकिटिंग पार्टनर ‘प्लॅटिनम लिस्ट’ने सांगितले की, तिकिटांची अशी विक्री होणे पूर्णपणे अवैध आहे. लोकांनी लक्षात घेतले पाहिजे की, इतर कुठल्याही माध्यमातून विकत घेतलेल्या अशा सर्व तिकिटांना स्टेडियममध्ये प्रवेश करताना अमान्य ठरवले जाऊ शकते. आयोजकांनीही आता तिकीट विक्रीत बदल केला आहे. आता भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे इतर सामन्यांच्या पॅकेजसोबतच उपलब्ध होतील.