गेल्या दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नैऋत्य मान्सूनने पुन्हा एकदा महाराष्ट्रात वेगाने प्रगती केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सक्रिय झाला असून, पुढील 48 तासांत तो मुंबईतही दाखल होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

राज्यभरातील 27 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. येथेही हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना विजांच्या कडकडाटापासून सावध राहण्यास सांगितले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना तसेच मच्छीमारांना हवामान विभागाने विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 24 आणि 25 जून दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाच्या या पुनरागमनामुळे शेतीच्या कामांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.







